राम ची शाळा
तिसऱ्या वयात येईपर्यंत अजून एक मोठी घटना राम च्या आयुष्यात घडली ती म्हणजे शाळा !! तिकडे फी भरेपर्यंत सगळे म्हणले ,"का इतक्या लवकर त्याच्यामागे शाळा लावतेस प्ले ग्रुप का असेना ,पुढे आहेच कि आयुष्यभर !!" माझी मानसिक तयारी झालेली असूनही , दोन ते तीन तासांसाठी घराच्या बाहेर राहणं ते अगदी अनोळखी ठिकाणी ही त्यांच्या आयुष्यातली खुप मोठी गोष्ट असते , हे मला राम ला पहिल्या दिवशी शाळेत सोडताना समजलं . ब्लॉसम प्रीस्कूल ला मी २०११ पासून पाहत होते, तेव्हा मी पदवी चा अभ्यास करत होते , योगायोगाने इथेच राम ला पण जाता आलं याचं मला समाधान आहे . पहिल्याच दिवशी शाळेतून " तुमच्या मुलाला उलटी झालीये रडून, त्याला घेऊन जा!!" असा फोन आल्यावर मला लक्षात आलं, माझ्या आईसाठी मला शाळेत पाठवणं जेवढा सोप्पं गेलं होत तेवढच मला राम ला शाळेत पाठवणं अवघड जाणार ! तेव्हा विचार देखील आला डोक्यात "घाई करतीये का मी" पण ब्लॉसम प्रीस्कूल च्या टोळ मॅडम नी मला खूप छान सांगितलं कि २ वर्ष पूर्ण झाल्यावर मुलाला प्ले ग्रुप ला का टाकावं ते मला थोडं नंतर म्हणजे, त्याच्या घरातल्या खोड्या वाढायला लागल्यावरच पटलं " की हा २ तास शाळेत जातोय ते बरं च आहे!!" . शाळेतून तक्रारी यायला लागल्यावर त्याची एकूणच पुढची शैक्षणिक वाटचाल माझ्या दृष्टीने खडतर असेल हे मला जाणवलं.
त्याच्या वागण्यातले , प्रश्न विचारण्यातले बदल मला आणि घरातल्या सगळ्यांनाच हळू हळू जाणवायला लागले , काहीतरी खेळता खेळता जेव्हा श्लोक गुणगुणायला लागतो तेव्हा प्रत्येक वाक्य रेकॉर्ड करून ठेवावं असं वाटतं . रात्री ३ वाजता पण आम्ही '१२ मंथस ऑफ द ' इयर ऐकतो . एकदा रात्री २ वाजता 'मराठी महिने बारा चैत्र , वैशाख ... पुढे काय??' असं म्हणला !! त्याची शाळा त्याच्यापेक्षा जास्त मीच एन्जॉय करते असं मला वाटतं. शाळेत जायला लागल्यापासून त्याचे चांगले गुण समोर आलेत जसे कि लक्षात ठेवणे , मुद्दे डोक्यात स्पष्ट असणे, योग्य पद्धतीने विचार करणे , यामुळे झालंय असं की मला राम ला फारसं वेड्यात काढता येत नाही , म्हणजे जसं आपल्या लहानपणी ढगां चा गडगडाट झाल्यावर , "म्हातारी पीठ ,दळतीये घरात या " असं सांगितल्या वर आपला विश्वास तर बसायचाच , आपण गपचूप घरात पण यायचो , विज चमकल्यावर "बाप्पा फोटो काढतो बरंका शहाण्यासारखं वागा !" आपला विश्वास बसायचा पण आता राम ला पहिल्यांदा मी म्हणलं राम म्हातारी पीठ दळतीये यावर, "कुठाय म्हातारी ?" तिच्याकडे गिरणी आहे का? ,आपल्या गिरणी सारखा आवाज का नई येते? ती खराब झालीये का? पीठ कुठाय ?" बस्स मी ठरवलं प्रथा मोडलीच पाहिजे मी ,नीट सोप्प्या भाषेत ढगांचा गडगडाट का होतो विज का चमकते , पाऊस कसा पडतो हे सांगितलं त्याने छान ऐकून घेतलं आणि विशेष म्हणजे प्रश्न विचारला नाही , त्यादिवसापासून त्याच पावसाला घाबरणं बंद झालं . खोड्या कश्या काढायच्या हे तो शाळेतच शिकलाय , आणि हि गोष्ट शिक्षक शिकवत नाहीतच हि पोरच पोरांचं बघून शिकतात यावर माझं ठाम मत आहे. अजून एका मोठ्या गोष्टीच महत्व राम ला शाळेत गेल्यावर समजलं ते म्हणजे 'वाढदिवस साजरा करणं ' आम्ही ९०'स किड्स असल्यामुळे वर्गात चॉकलेट वाटणे , अगदीच नाही तर पेन्सिल वाटणे , संध्याकाळी घरी औक्षण ,केक कापणे सोसायटी मधलीच मित्र -मैत्रीण असायचे , आता २१'स किड्स ची वाढदिवस साजरा करण्याची पद्धत पूर्ण वेगळी आहे , आता कप चाके आणि रिटर्न गिफ्ट चा ट्रेंड आम्हाला राम मुळेच माहिती झाला. आणि याची सवय करून घ्यायला हवी असं आमचं ठरलं आहे .त्याचं स्वाती आणि स्नेहा टीचर शी निर्माण झालेलं नातं तो किती लक्षात ठेवेल हे माहिती नाही पण मी मात्र कधीच विसरू शकणार नाही . तर रामची पहिली शाळा , त्याचे पहिले शिक्षक , पहिली सहल , त्यानं सादर केलेलं पाहिलं नृत्य , हे त्याच्या लक्षात राहील तर छानच , पण माझ्या कायमच लक्षात राहील .

Comments
Post a Comment