मैत्र जीवांचे
दुसऱ्या वर्षांपासून मुलांची मैत्री सगळ्यात आधी होते ती त्यांच्या खेळण्यांबरोबर ! राम कडे खुप खेळणी आहेत तरीपण त्याची सगळ्यात आधी मैत्री झाली ती त्याच्यापेक्षा ८ वर्ष मोठ्या असणाऱ्या मुलांबरोबर, लॉकडाउन च्या काळात ह्या मुलांची ऑनलाइन शाळा संपली की सगळी सेना एका मजल्यावर जमायची आणि क्रिकेट, आंधळी कोशिंबीर पासून अगदी अप्पारप्पी पर्यन्त सगळे खेळ त्या छोट्याश्या जागेत खेळायचे कारण मैदानावर जायला आणि सोसायटी मध्ये फिरायला मनाई होती. राम एकदम खुश सगळ्यांना खेळताना बघून! खुप हसला, ओरडला, दोन्ही हात वर करून ये केलं ! त्या मुलांना पण राम आवडला. मी एक दिवस त्या सगळ्यांना घरी बोलावलं , मग काय रोजचा जमायचा अड्डाच बनून गेला रामचं घर!! कारण या मुलांना गोंधळ घालतात म्हणून सगळेच "आपल्या आपल्या घरी जा!" असं सांगून पळवून लावायचे मी आणि प्रणव नी मात्र तसं नई केलं , त्या सगळ्यांना इतका आवडलं ते आणि अर्थात, राम पण ! रामला पण सगळी मुलं खूप आवडली तो त्यांच्याशी खूप मस्ती करायचा आणि त्या सगळ्यांनी सुद्धा राम ला त्याच्या कलानी घेऊन खेळवलं , त्यांच्या येण्यामुळे राम एकलकोंडा होईल की काय या लॉकडाउन मुळे अशी मला वाटणारी भीती पळून गेली, त्यांच्या येण्याने राम खूप वेगळे वेगळे शब्द बोलायला शिकला , आपले खेळ नक्की कशापद्धतीने खेळायचे ते शिकला ,अगदी मारामारी करायला देखील शिकला. थोडेच दिवस, शाळा, क्लास ,ग्राउंड सुरु झाल्यावर त्यांचं येणं हळू हळू कमी झालं ,राम ला पण मी शाळेत घातलं आता फक्त "हेल्लो आणि हाय" पुरते दिसतात सगळे . मग राम च्या आयुष्यात, शाळेतले मित्र आले. शाळेतला आरुष जेव्हा बागेत सुद्धा भेटला तेव्हा रामच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपायला मोबाइल काढायचेच विसरले आणि त्यांची भरतभेट नुसती बघतच राहीले . त्या दिवसापासून शाळेत आणि बागेत असे सकाळ संध्याकाळ दोघे भेटू लागले , एकत्र खेळू लागले. एकमेकांच्या घरी जायचे हट्ट पण धरू लागले , इतक्या लवकर " आरुष माझा बेस्ट फ्रेण्ड आहे " असं मला ऐकायला मिळेल याची मी कल्पनाच नव्हती केली !
काही अपरिहार्य कारणामुळे दोघांची शाळा वेगळी होणार आणि दोघांना आता भेटता येणार नाही याची रुखरुख त्या दोघांपेक्षा आम्हालाच जास्त लागली आहे . आमच्या बिल्डिंग मध्ये काव्या आणि अनन्या आहेत त्या २ वर्षांनीच मोठ्या आहेत राम पेक्षा त्यांच्यासोबत "तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना !" अगदी अशीच मैत्री आहे , याला त्या दोघी आणि दोघीना हा, हवा तर असतो खेळायला , नको पण असतो ! खोड्या ,भांडणं रडारडीसोबत , मस्ती, हसणं , खिदळणं असं सँडविच आहे यांची मैत्री! तहान, भूक, जेवण, झोप विसरून खेळणं चालू असतं तिघांचं सुट्टी असली कि हाक पण मारायची नाही यांना !! त्या दोघी थोड्या मोठ्या असल्यामुळे राम बरचं काही शिकलाय त्यांच्याकडून , वर्गातील कविता ,गोष्टी ,कट्टी करणे , बट्टी करणे , ओरडाआरडा, धिंगाणा ,
रामच्या खोड्याना त्या दोघी अगदी कंटाळून जातात, कधी चिडतात , मग मला नाव सांगायला येतात मग मी राम ला रागावल्यासारखं करते हा रोजच्या खेळण्यातला भाग असतो तिघांचा. 'या दोघी माझं नाव आईला सांगत आहेत' याची राम ला खूप मज्जा वाटते आणि 'राम ची आई आपला ऐकून राम ला रागवतीये' याची त्या दोघीना खुप मज्जा वाटते . त्या दोघीना असं वाटतं कि राम नि आपल्या शाळेत यावं याची एवढी चर्चा केलीये त्या तिघांनी कि राम च्या शाळेत राम नि त्याच्या शाळेचं नाव न्यू इंडिया स्कूल सांगितलं ! " उद्या येताना मी काव्या अनन्याला घेऊन येतो असंही सांगून आला ! इतक्या लहान वयात राम ला मैत्रीची जादू अनुभवायला मिळतीये यापेक्षा जास्त छान ते काय असू शकतं . आत्ताशी फक्त सुरवात आहे याची मात्र सारखी जाणीव मी स्वतःला करून देत असते.

खूपच छान. आजकाल चांगले मित्र, मैत्रिणी मिळणे याला पण नशीब लागते असे वाटते
ReplyDeletekharay tumch!
ReplyDelete